वसई परिसरातील सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समाज हा जरी ख्रिश्चन असला, तरी भारतीय हिंदू परंपरा त्यांनी कशा जपल्या, हिंदू सण-उत्सव ते कसे साजरे करतात, येथील मातीशी आणि संस्कृतीशी त्यांची नाळ आजही कशी जोडलेली आहे, ते मूळ हिंदू कसे आहेत? हे सांगणारे पुस्तक….
लेखक : दीपक जेवणे
मूळ किंमत : रु. 300/-
सवलत मूल्य : रु. 270/-
नरेन्द्र विश्वनाथ पेंडसे –
चेहरा मूळ धर्माची नाळ जपणाऱ्यांचा
दीपक जेवणे लिखित ‘ चेहरा ‘ या पुस्तकाचे वर्णन वरील चार शब्दांत करता येते. माननीय मोहनजी भागवत यांनी जेव्हा सांगितले की सर्व भारतीयांचा DNA एकच आहे म्हणजेच त्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन सुद्धा समाविष्ट आहेत तेव्हा एकच गदारोळ उठविण्यात आला होता. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रश्नाचे विस्तारित रूप आणि काही प्रमाणात उत्तर या पुस्तकात मिळते. परंतु विषय असा अवघड असूनही पुस्तक मात्र अतिशय सोपे, रंजक, वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. ही किमया लेखकाचे कौशल्य आणि विषयाचे नाविन्य यांच्यामुळे झाली आहे.
वसई भागात ख्रिश्चन समुदाय मोठ्या संख्येत आहे. हा समाज काही मूळ पोर्तुगीज नाही. पोर्तुगीज सत्ता या भागात असताना जे धर्मांतर झाले त्याला बळी पडलेला हा मूळ हिंदू समाज आहे. त्यातील केवळ सामवेदी ब्राह्मण समाज निवडून श्री. दीपक जेवणे यांनी काही दिवस त्यांच्या सहवासात व्यतीत केले. या सहवासात त्यांना जे थक्क करणारे अनुभव आले त्यांचे वर्णन म्हणजे हे पुस्तक “चेहरा”.
मुळात सामवेदी ब्राह्मण असल्याने निसर्ग, पक्षी, पशू यांना सोबत घेऊन जगणारा, त्यांना स्वतःच्या भावविश्वात अढळ स्थान देणारा हा समाज आहे. अगदी त्यांच्या लग्नाच्या विधीत चिमणीला काय स्थान आहे हे देखील पुस्तकात वाचायला मिळते. जेव्हा ही गोष्ट निघते आणि लेखक ज्ञानेश्वर महाराजांचे काऊ प्रेम वर्णन करू लागतात तेव्हा फादर निकोलस ‘पैल तो गे काऊ कोकताहे ‘ हा अभंग अगदी तन्मयतेने गाऊन दाखवतात. घराला बांधलेले तोरण त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवते आणि त्याबरोबर असलेला मटणाचे वडे तळण्याचा प्रकार बदललेली जीवन शैली दाखवतो. चर्च मध्ये जाऊन ख्रिश्चन धार्मिक गीते म्हणायची आणि घरी येऊन केळीचे आणि आंब्याच्या डहाळ्यांचे तोरण बांधायचे अशा पद्धतीने नव्या आणि जुन्यातील चांगल्या प्रथांचे मिश्रण केलेले दिसते.
इंग्लंड मध्ये जन्मलेल्या फादर स्टीफन्स यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या रूपात लिहिलेले ख्रिस्तपुराण लेखकाला पहायला, ऐकायला मिळते. लेखक सुद्धा लहानपणी शिकलेल्या आणि पाठ केलेल्या ख्रिस्त पुराणातील ओव्या म्हणून दाखवतो. स्थानिक ख्रिश्चन कीर्तनकार आणि हिंदू धर्माचा कीर्तनकार असलेला लेखक यांच्यातील अशा विविध विषयांवरील संवाद आपल्याला एका वेगळ्याच वैचारिक पातळीवर घेऊन जातो.
पोर्तुगीज गोव्यात आणि वसईत कसे आले, त्यांनी धर्मांतर कसे घडवले, धर्मांतरित होऊनही मूळ संस्कृती जपणाऱ्या लोकांसाठी ख्रिस्ती धर्म न्यायालय कसे स्थापन झाले हे सर्व काही चर्चेतून उलगडत जाते. धर्म न्यायालयामध्ये फक्त हिंदू समाजच भरडला गेला अशी असलेली आपली समजूत हे वर्णन वाचल्यावर बदलून जाते. चिमाजीआप्पा वसईची मुक्तता करण्यासाठी लढले आणि जिंकले तेव्हा अनेक धर्मांतरित हिंदू धर्मात परत आले, मग सामवेदी ख्रिश्चन पुन्हा हिंदू धर्मात का आले नाहीत? याचे उत्तर या पुस्तकात स्पष्टपणे नाही परंतु अस्पष्टपणे मिळते. अशा विषयांची चर्चा करणे किती अवघड असते हे या प्रसंगावर लिहिलेले प्रकरण वाचताना लक्षात येते.
लेखकाने बारा गावांमध्ये प्रवास आणि निवास करून घेतलेले अनुभव अकरा प्रकरणांमध्ये वर्णन केले आहेत. धर्म पर्व, नवधर्म पर्व, शिक्षण पर्व, गृहस्थ पर्व, उद्योग पर्व यांच्यासोबत भविष्यवेध पर्व देखील आहे. त्यामुळे सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समाजाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा सर्वांचे दर्शन आपल्याला घडते. २१५ पानांच्या या पुस्तकाची छपाई उत्तम कागदावर केली गेली आहे, वापरलेला फाँट वाचायला सुखद आहे, समर्पक छायाचित्रे जागोजागी वापरली आहेत आणि ‘ चेहरा ‘ या शीर्षकाला साजेसे चित्र मुखपृष्ठावर आहे. ठिकठिकाणी घेतलेली बायबल मधील वचने त्या त्या प्रकरणात आलेल्या विषयाची पार्श्वभूमी तयार करते. मूळ बायबल मध्ये अनेक वचने आपल्याला विस्कळीत वाटतात पण इथे वापरलेली वचने मात्र सुसंगत वाटतात.
लेखकाने निष्कर्ष काढला आहे की या समाजाने उपासना पद्धती बदलली आहे, दैवत बदलले आहे परंतु संस्कृती सोडलेली नाही, परंपरा सोडलेली नाही, देशावरील निष्ठेत कोठेही तडजोड केलेली नाही. हे पुस्तक वाचून लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत होता की नाही हे अवश्य पडताळून पहा. कारण धर्मात्याग केल्यानंतर मूळ परंपरा पाळण्याला काही अर्थ आहे की नाही याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असणार आहे. त्याचबरोबर हे पुस्तक आणखी एका वेगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे असे मला वाटते. आपल्याला विधर्मी लोकांशी बोलताना एक प्रकारचा अवघडले पाणा जाणवत असतो. जे धर्मांतरित आहेत त्यांच्याशी हिंदू धर्माबद्दल कसे बोलावे, आपल्या मनात असलेले प्रश्न कसे विचारावेत हे आपल्याला उमजत नाही. काही प्रश्न विचारल्यावर ते नाराज होतील, त्यांना आवडणार नाही असे गृहीत धरून आपण अशा पद्धतीची चर्चा टाळतो. या पुस्तकात अशा बऱ्याच चर्चा आहेत. लेखक कशा पद्धतीने संवाद साधतो, त्याला प्रतिसाद कसा मिळतो, कोणत्या प्रश्नावर प्रतिसाद मिळत नाही हे अगदी स्पष्टपणे वाचायला मिळते. असा संवाद साधू पाहणाऱ्या कोणीही हे पुस्तक वाचावे आणि अशा प्रकारच्या उपक्रमास प्रारंभ करावा इतके मार्गदर्शन या पुस्तकातून नक्कीच मिळते. त्यामुळे या संवाद शैलीला आत्मसात करून, भविष्यकाळात अशा विविध समाजांशी संवाद साधून त्यांची स्थिती आपल्याला जाणून घेता येईल असे वाटते.