देवराई हा आपला सांस्कृतिक वारसा. आपल्या पूर्वजांनी ईश्वरी संकल्पनेशी मेळ घालत माणूस आणि पर्यावरण यातील नात्याचा सुरेख बंध विणला. एका अप्रतिम निसर्गसंवर्धन प्रक्रियेला सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये गुंफून श्रध्देच्या साहाय्याने ‘देवराई’ ही संकल्पना लोकांमध्ये रुजवली. आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती हस्तांतरित होत राहील याचीही व्यवस्था केली. मात्र नागरीकरण वाढत गेल्याने लोकांचा निसर्गाशी असलेला संपर्क आणि नातेसंबंध कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे ‘देवराई’ ही संकल्पना धोक्यात यायला लागली.
आपला या सांस्कृतिक वारशाशी कमकुवत होत चाललेला संपर्क आणि संबंध पुन्हा बळकट व्हावा आणि सर्वसामान्य लोकांचं लक्ष या संकल्पनेकडे आणि तिच्या महत्त्वाकडे वळवावं हेच या पुस्तकाचे उद्दीष्ट आहे.
पुस्तकातून देवराई ही संकल्पना, देवराईचे वेगवेगळे पैलू, देवराईपुढची आव्हानं, देवराई आणि पाणी, देवराईमधील देवता, देवराई आणि जैवविविधता असे अनेक विषय मांडण्यात आले आहेत.